Showing posts with label शाळा. Show all posts
Showing posts with label शाळा. Show all posts

Thursday, 11 May 2017

शाळा- मंतरलेले दिवस

                                शाळा- मंतरलेले दिवस

स्वप्नवत विद्यालयाचे प्रवेशद्वार
                   शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक  हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं. दहावीचा शेवटचा पेपर दिल्यावर मला अचानक भरून आलं शाळा संपली या जाणीवेनेच मी बैचैन झालो व ४ तास रानात वडाच्या झाडाखाली बसून गेल्या ५ वर्षात डोकावून पाहिलं.
एप्रिल महिना कडाक्याचा उन्हाळा चालूय, सर्वत्र भकास वातावरण, उन्हाच्या झळांनी दुपार अगदी न्हाऊन निघालीय, शाळू व खपली गव्हा ची शेते उरलेल्या पालापाचोळ्यासह निपचित पडून आहेत, दूर कुठेतरी कडबा भरून जाणाऱ्या  बैलगाडीच्या चाकाचा लयबद्ध आवाज कानी पडतोय, बाजूलाच गव्हाचं भुस्काट चघळत २ म्हशी संथपणे  रवंथ करण्यात मग्न आहेत. सावलीला जमलेल्या पाखरांची हलकीशी किलबिल सुरु असतेय मी मात्र स्वतःतच मग्न. !!आता आपले मित्र दुरावणार, सर्वजण वेगवेगळीकडे जाणार या विवंचनेत हायस्कुल ला प्रवेश घेतल्यापासून च्या एक एक घटना डोळ्यासमोरून सरकू लागल्या, डोळे घट्ट मिटून मनाला अगदी खोलवर घेऊन जात आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागलो -

             ____________________  -पाचवी ते सातवी -  __________________
 
             दिनांक १६ जून १९९९ इ पाचवी मध्ये गावापासून ३किमी दूर पंचक्रोशीत एकमेव असणाऱ्या श्री मुकुंदराज विद्यालय  शाळगाव येथे प्रवेश घेतला,गावापासून दूर माळरानावर २०-२५ एकरात पसरलेली ती भव्यदिव्य शाळा पाहून जॅम हरकून गेलो. २ भलीमोठी लाल मातीची  मैदाने, सभोवताली निलगिरी व पिंपर्णीच्या झाडांची गर्दी व मधोमध १४ खोल्यांची कौलारू टुमदार इमारत.

शाळेचा दर्शनी भाग
                           करांडेवाडीतून ४ मुले व ७ मुली पाचवीत प्रवेशती झाली, सर्व अनोळखी मुले आपापले गट करून ,  त्यामुळे न्यूनगंडात भरच.  पण हळू हळू वातावरण निवळलं  नवे मित्र झाले, विषयांत गोडी लागली, पाहता पाहता सत्र संपले द्वितीय सत्र सुरु झालं प्रगतीपुस्तकावर मार्कांच्या राशी पडू लागल्या त्यामुळे एकूणच मी त्या वातावरणात मिसळून गेलो, त्यातच सहलीच पत्रक आले. जाऊन हि आलो.  द्वितीय सत्र हि उत्तम मार्कानी पास झालो, पुढच्या वर्गात नव्या गमतीजमती सुरु. पुन्हा  तो पावसाळा, ते सायकल वरून रपेटी मारलेल्या, चिखलात ब्रेक दाबून सायकल फरफडत नेत केलेले स्टंट, तो सुरपाट्यांचा डाव, शाळेच्या कित्येक हेक्टर वर पसरलेल्या मैदानात पावसात खेळलेले फुटबॉल अशी मनात आठवणींची रेलचेल सुरु झाली.


 वरील  सर्व फोटो साभार - राम करांडे
                                एव्हाना वेगवेगळे विषय व त्यांचे सर यांची समीकरणे मनात पक्की होत गेली.  मराठीसाठी  मराठीची बोलीभाषेपासून वाङमयपर्यंत भाषेची उत्तम जाण असणाऱ्या सौं. घाडगे मॅडम,   विज्ञान  म्हंटलं  हलक्या फुलक्या भाषेत सजीव उदाहरणासह पण शेजारचे ४ वर्ग शिकून निघतील अशा खड्या आवाजात  शिकवणाऱ्या सौ शिंदे मॅडम. हिंदीला अभंग सर, इंग्रजीला हेरवाडे सर हे जरा जास्तच कडक व्यक्तिमत्व, इतिहास भूगोल या विषयात मात्र बऱ्याच सरानी प्रयत्न करूनही  विषयाला योग्य हाताळतील असे शिक्षक नव्हते मिळाले ती कसर मात्र नवखेच पोरसवदा असलेले कदम NV  यांनी भरून काढली,इतिहास भूगोल शिकविण्याची त्यांची पद्धत खूपच रंजक-परिणामी  इतिहासातील मगध साम्राज्याचा उदय, मौर्य, सातवाहन,  बिदूंसार, कनिष्क, कलिंग ची लढाई इ. प्रकरणे कायमची कोरली गेली.  त्याचबरोबर  भूगोलात कांगो नदीचे खोरे, टुंड्रा प्रदेश, नाईल चे खोरे इ शब्द त्यांच्याच आवाजात अजूनही कानात गुंजतत्.
                    तत्कालीन आमच्या दृष्ट्या मुख्याध्यापकांच्या दूरदृष्टीने शाळेत आलेल्या संगणकासाठी तसे पूर्णवेळ तद्न शिक्षक न लाभल्याने व नाविन्याची गोडी आधीपासूनचीच असलयाने स्वतःच विविध पुस्तके आणून अभ्यास सुरु झाला, परिणामी मी, धनंजय, जयवंत आमचं वजन आपसूकच वाढल व पुढे तद्न शिक्षक आल्यानंतर आम्ही बऱ्या पैकी टेकसॅव्ही झालो ते कायमचेच. विविध कारामतीत हेही वर्ष गेले आणि हो सहल !! पुणे देहू आळंदी भन्नाट झालेली हि पण अविस्मरणीय सहल !
                         ________________________________________________________ 

         सर्व कसे मजेत होते पण एक गोष्ट जरा विदारकच! तत्कालीन सामाजिक परिस्थीचा परिणाम म्हणा हवं तर पण शाळेत मुला -मुलींच्यात कमालीचं भेदभावाच वातावरण होतं. वर्गात मुलींशी बोलणे म्हणजे मोठा गुन्हाच तो . त्यातच वर च्या वर्गातील पोरांनी आधीच घाबरवून सोडलेलं मुलींशी बोलायचं नाही सरानी पाहिलं तर बेदम मार  मिळतो इ. सरांनीही कधी या आमच्या गैरसमजला दूर नाही केलं उलटपक्षी तो दृढ कसा होईल अशीच काहीशी धोरणं  असायची, अर्थात त्यामागे त्यांची कदाचित मुलींच्या सामाजिक सुरक्षेची भावनाही असेल पण मार्ग मात्र चुकीचा होता. आमच्या सारखा निरागस, खट्याळ पोरांवर दाखवलेला  अविश्वास वाटतो तो मला. परिणामी मुलांच्या दोन ओळी व मुलींच्या २ ओळी यामद्धे प्रचंड खुनशी वातावरणाने जागा घेतली. जिथं खेळी मेळीच वातावरण असावं तिथंच विरोधीपणाची भावना वाढीस लागलेली.
एक एक प्रसंग आठवतोय मला तुम्ही चकित व्हाल- एकदा एक मित्र धावत धावत एक बातमी घेऊन आला, क्षणाचाही विलंब न करता आम्ही बातमीची खातरजमा करायला १० अ या वर्गाकडे धावलो. बातमी अशी होती कि  १० वि तील एक आमच्या गावातील विद्यार्थी वर्गातील एका मुलीशी वर्गात खुलेआम गप्पा मारतोय! कदाचित मुलं कळती झाल्यामुळे वा एखाद्या सरांच्या विषयप्रगल्भतेमूळे थोडंसं तिकडील वातावरण निवळलं असेलही  पण आमच्या साठी मात्र तो प्रसंग दुर्मिळातील दुर्मिळ प्रसंगातील एक होता. अक्षरशः काहीतरी बेकायदेशीर कृत्य शाळेत चालू आहे या अविर्भावात अचंबित होऊन आम्ही त्या घटनेचे साक्षीदार झालो . असो अशी विषमता होती त्यावेळी पण मी मात्र माझ्या वयक्तिक पातळीवर हि विषमता दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू ठेवलेलं. त्याच्याच एक भाग म्ह्णून मी इ. ७ वि पर्यंत वार्षिक एक प्रयत्न असे ३ प्रपोज पाठवलेले पण या प्रयत्नांना सपाटून अपयश आले. (नंतरच्या काळात  संबंधित व्यक्तीना  बालपणीच्या नाकारघंटेचा पश्चाताप झालाही असेल म्हणा ;) ) मुलींचा किल्लेकोट अगदीच भक्कम असल्याने मला ती तटबंदी भेदता  आली नाही आणि दरी आणखी वाढत गेली.
        असो, याच वर्षात गणिताला तिवले सर नवीन रुजू झालेले सडपातळ बांधा, सदैव उत्साही मनुष्य, हसरा चेहरा, आपल्या वेगळ्या शैलीत अगदी सोप्पे करून शिकवणारी गणिताची पद्धत यामुळे अचानक माझा गणिताचा ग्राफ उंचावला. दरम्यानच्या काळात जाधव AD सर चित्रकलेला आले, माझ्या काही चित्रांचा आखिवरेखीवपणा पाहून जरा प्रोत्साहन देताच लहान गटात मला प्रथम पारितोषिक मिळाले ते सालाबादप्रमाणे इ.९वी  पर्यंत सोडले नाही आणि मला सूर गवसला.(१० वित असले चांगले उद्योग करणे बंद केलेले मी )
याच काळात गांगुली च्या संघाने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पडसाद आमच्याही भागात उमटले परिणामी आम्ही सदैव कुठेतरी माळावर बॅट बॉल घेऊन दिसू लागलं. तेव्हा जर IPL असते ना तर आमचा MSB अर्थात Mukundraj Super Blasters नावाचा एखादा तरी संघ असताच :D

               _______________________-आठवी ते नववी- __________________
 
 हेही वर्ष संपले मोठे होऊ  लागलो.  
२००४ चा उत्तरार्ध दुष्काळ घेऊनच आला. किरकोळ परीक्षा शुल्क भरतानेही पालकांची चाललेली घालमेल अनुभवली, १०-२० रुपये सुद्धा संकट वाटू लागलेले... नोकरदारांना पगार फिक्स असतोच त्यांचं जगणं  सुसह्य होते मात्र शेतकऱ्यांचे हाल पाहवत नव्हते. अचानक समज आली.पैशाची किंमत कळली. जबाबदारी अंगावर आली. सर्वत्र रान कोरडे पडलेलं, पाऊसकाळ कमी, गुरांसाठी शाळेच्या माळावर चारा छावण्या  लागल्या. दुपारच्या सुट्टीत गुरांसाठी शासनाकडून येणारा ऊस खाणे हा आमचा टायम पास! टँकर आला की  रंगलेला क्रिकेट चा डाव सोडून जमेल तितका ४   दिवस पुरेल एवढे पाणीसाठा करून घेण्यासाठी धावाधाव करायला लागायची.
८वी साठी  दुष्काळ हीच एक आठवण
इ. ९वी teenagers मधील एका महत्वाच्या टप्प्यावर होतो अभ्यासातील प्रगतीही उत्तम होती, विविध उपक्रमात सहभाग चालूच होता (अप्रत्यक्षरीत्या पोरींना प्रभावित करण्याची कोणतीच संधी सोडली  जायची  नाही ;) )
सेप्टेंबर महिना आला कि वेध लागायचे ते विविध स्पर्धांचे निमित्त कर्मवीर जयंती रयत च्या सर्व संस्थामधील मानाचा उत्सव. यावर्षी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन काही मुली खूपच हवेत गेल्या होत्या साहजिकच  त्यांना खाली आणण्याची जबाबदारी उरावर घेऊन रांगोळी स्पर्धेत भाग घेतला. गालिचा, मोर, ठिपक्यांची कासवं-बिसवं याना फाटा देत कृष्णाला प्रेम पत्र लिहणारी राधिका चितारली व रांगोळीचे रंग भरले. चित्रकलेच्या राज्यस्तरीय स्पर्धा केलेल्या असल्याने बारकाव्याचा भारी अभ्यास!  सोबत अचूक रंगसंगती, शृगांरिक भाव व घट्ट असे मापकच कपडे यामुळे खूपच आकर्षक रांगोळी झाली होती. नंबर पक्काच !पण आमच्या परीक्षकांना या रांगोळीतील किंवा चित्रातील आखीव रेखीवपणा, गोलाई (curves ) हे  माझे वय लक्षात घेता रुचला नाही व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. चालायचे !
हेच  चित्र  जे आखीवरेखीव रांगोळी म्हणून काढलं होतं मी

                यावर्षीची सहल जरा खास च ठरली कारणेही तशीच, महत्वाचे म्हणजे आम्ही जाणते(???) झालेलो. मुक्कामी सहल, खट्याळ बुद्धी. आणि अतिमहत्वाचं म्हणजे स्वतःचा कॅमेरा घेऊन त्या काळी सहलीला जाणारा पहिला विद्यार्थी.नशीबवान होतो सहलीसाठी कपडे खरेदीला गेलो असता एके ठिकाणी सेल होता विविध सरप्राईझ गिफ्ट होते माझं लक्ष कॅमेरावर होत आणि 'मेरी सून ली ' कॅमेरा लागला रोल वाला.(आत्ताच्या हवा करणाऱ्या पोरांना कोण सांगणार कि मोबाइलपण नव्हते तेव्हा योगेश आलेकरी कॅमेरा वापरत होता ) (मनोमन म्हटलं या या कॅमेराच्या भांडवलावर ३-४ तरी लायनी क्लिअर होणार ;) )पुढे त्या कॅमेराने मोठं रामायण रचलंच.
   सहलीवरून आल्यावर एक रोल बाकी होता कोडॅक चा होता वाया नव्हता घालवयचा म्हणून मग आम्ही NCC च्या ड्रेस वर आमच्या ग्रुप चे फोटो काढायचे संमत झाले. एव्हाना माझ्या प्रयत्नांना थोडंफार यश येऊन दरी कमी झालेलीच त्यामुळे काही मुलींनी पण फोटोसेशन साठी विचारणा केली आणि आम्हीही  निर्णयाचं स्वागत करत सामील करून घेतलं (आम्हालाही तेच हवं होत म्हणा ).
                                झालं तारीख ठरली २६जानेवारी २००५ प्रजासत्ताक दिन आटोपून आम्ही, आम्ही संगोपन केलेल्या पेरूच्या बागेत आमचं छायाचित्रण चालू असतानाच जाधव सर व भोसले सर यांनी धाड टाकली आणि एकेकाला चोप दिला अचानक झालेल्या हमल्याने गांगरून गेलो. कर्णधार या नात्याने मलाच पाहिलं धरला आणि तुडवून काढलं आणि माझ्यातील एका उभारी घेणाऱ्या फोटोग्राफरला अक्षरशः तुडवून मारला रे !
नंतर स्टाफ रूम मध्ये उलगडा झाला कि का मारला एवढं, कारण कि,  मुलींचे फोटो काढणे गुन्हा आहे.फोटो एडीट करून काहीही करता येऊ शकत असे बेबुनियाद आरोप लावले गेले पण आमच्या मुख्याध्यापकांच्या सहिष्णू वृत्त्तीमुळे त्यांनी आमची बाजू घेतल्याने दिलासा मिळाला.... !!!                                         
                   वर्ष संपलं पुन्हा तेच दुपारचे पेपर, विहिरीवर येथेच्छ डुंबणे, कैऱ्या, पेरू, काकड्या चोरणे आणि क्रिकेट.
                            __________________  -दहावी -________________
               
                        आता अभ्यासाच ओझं वाढलं  बघता बघता दहावीत आलो, समज वाढली सकाळी ८ वाजता अभ्यासिकेला शाळेत सर्वजण जमू लागलो. गप्पांच्या फडात अभ्यास पेक्षा लैगिक विषय जास्त या चर्चा होऊ लागल्या. हाच काय तो आमचा माहितीचा स्रोत.
काळ शारीरिक संक्रमणाचा होता. भिन्नलिंगबद्दल आकर्षण, मानसिक शारीरिक बदल जाणवू लागलेले एका बाजूला अभ्यास तर एका बाजूला हे मानसिक हलकल्लोळ सांभाळणे कठीण जात होते. प्रश्न  होते उत्तर मिळत नसत. स्वतःची सतसतविवेकबुद्धी  वापरून बऱ्याच प्रश्नाची उकल हि  व्हायची पण खात्रीशीर उत्तर नसायचे. भावना नुसत्याच चाळवल्या जायच्या. आजच्या सारखं गूगल नव्हते त्यावेळी कि लगेच हातात सर्व. संगत चांगली राहिल्याने तसल्या फिल्म हि खूप च उशिरा पाहण्याचा योग आला. 'जेवढे दूर तेवढी उत्कंठा जास्त' या नैसर्गिक नियमानुसार या साऱ्याच गोष्टींची उत्कंठा जास्त होती, होणारच कारण आमच्याकडे मुलींशी बोलणेही वर्ज्य होते.  अशा फावल्या वेळात गाप्पान्चे फड रंगायच पोरं स्वतःच जोड्या लावायचे 'हि' माझी,  'ती'  ह्याची वगैरे वगैरे.  कधी एखादा मनोराजा उगीचच एखादी सोबतच्या घालवलेल्या वेळेच्या  सुरस कथा सांगायचा. आम्हीही आपले कान देऊन ऐकायचो कधीतरी एखाद्याची सत्य घटना असली तरी बाकी ९९%  थापाच असायच्या त्याही आम्ही मजा घेत ऐकायचो... मग प्रत्येकाला वाटायचं आपली पण एक मस्त लव्हस्टोरी असावी यातून मग एकेक काल्पनिक कथा  स्वताची म्हणून घोळक्यात मारली जायची, ज्याच्या त्याच्या बुद्धीवर कथेचा दर्जा ठरला जायचा काहींची कथा फारच सुमार असायची सुरवात होता क्षणीच आम्ही त्याला वेड्यात काढायचो. पण काहींनी मात्र जान ओतलेले असायची आह्ह काय ती कल्पना .... काय ते वर्णन ... काय ते टाईमिंग जुळलेलं ..देखावाच डोळ्यासमोर उभा राहायचा ... !
तिकडे मात्र ती  स्वप्नसुंदरी  धुनी-भांडी केरकचरा काढण्यात एवढी गर्क असायची कि आपण कुणाचे आणि आपला कोण राजकुमार? व  आपल्यासोबतच्या शृगांरिक कथांच्या रंगलेल्या महफिलीचा तिला  तिळमात्र गंध नसायचा.अभ्यासाच्या सोबतीला हा सिल्याबस बाहेरचा अभ्यासही  आला होता. खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा लैंगिक शिक्षण द्यायला  बाहेरचे शिक्षक आले व ज्यादाचे तास घेतले गेले. मुला-मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवून दहावीच्या वर्गाला  लैगिक शिक्षण देण्याचा घाट घातलेला आणि त्याची गरज हि होतीच. समोर मानवी शरीर त्याची रचना, गुप्तांग, त्यामधील बदल, समस्या, काळजी वगैरे समोर दाखवले जात होत पण आम्हला चिंता कशाची ? हेच तिकडे मुलींच्या रूम मध्ये पण दाखवला गेले असेल तर मुलींची काय रिअक्शन असेल ? पुढे वाढलेलं राहिलं बाजूला आम्ही या विवंचनेत कि तिकडे अमकी अमकी फारच निरागस  आणि लहान, तिच्या बालमनावर काय विपरीत परिणाम होईल ही  चित्रे पाहून, तिची काय अवस्था होईल हे पाहून या नुसत्या विचारानेच आमच्या काळजात चर्रर्र व्हायचं !का न व्हावं ? काळजीच तेवढी होती.
"मुलांना आपण जेवढे लहान समजतो किंवा ठेवतो तेवढी ती लहान नसतात" 
दहावी 'ब' २००६ बॅच    (मागिल रांगेत डाव्या  बाजूला उजवीकडे खाली पाहणारा मी आहे )

आम्ही कितीही विनोदात ते घेतले असले तरी माहिती खूप मिळाली होती खुप उत्तरे मिळाली होती बदल झाला  होता नंतर  कंडोम कसे असतात कसे वापरतात याची प्रात्यक्षिके दिली, सेक्स म्हणजे काय प्रेम, सेक्स, आकर्षण यातील फरक हळू हळू स्पष्ट झाला. एव्हाना बरेच कळते झालेलो एक बाजूने दहावीचा अभ्यास होताच यावर परिणाम नाही पण काहींच्या अभ्यासावर मात्र खुप परिणाम दिसून आला. एका अवलियाने त्या बाहेरच्या शिक्षकांचे कंडोम चे बॉक्स पळवले मग नंतर ४ दिवस फुल्ल टाईमपास नुसता प्रात्यक्षिके घेण्यातच ! त्यात एक बकरा सापडला एकाने गुपचूप कंडोम लावून पहिला व कौतुकाने आम्हाला सांगितलं म्हटलं याची गम्मत करावी - त्याला बोललो 'चूक केलीस मोठी असं नसतं करायच.  लग्नाआधी कन्डोम लावलास तर नंतर 'हे' 'हे' त्रास होतात "हे' होणार नाही "ते" होणार नाही . घाबरला तो . त्याला बोललो उपाय एकाच गोमुत्राने धुवून पवित्र करून घे मी ऐकलंय कुठंतरी खरं असतंय. बिचारा २ तास रानोमाळ हिंडून गाई शोधून पवित्र होऊन आला.
असो,
अशा गंमती होत राहायच्या. लिहण्यासारखं खूप आहे. ;)  पण लेखन सीमा.

दहावी 'अ' २००६ बॅच
असो. रात्र अभ्यासिका झाली.सराव झाली. मुख्य परीक्षा आली, हिंगणगाव, जे कि ५ किमी दूर होते  तिकडे परीक्षा केंद्र. मुलींनी टमटम ठरवलेली प्रवासाला तर आम्ही सायकल फ्रीफेर केली. येडे फाट्यावर वडापावच्या गाड्यावर झालेली गर्दी पाहून फुकट वडापाव खाऊन गुपचूप पळ काढताना भारी मजा यायची .. !
पेपर काहींना अवघड तर काहींना सोपे गेले. माझी बेरीज ७१% वर जात होती तेव्हाच जाणवले या सर्व वातावरणाचा नकळत आपल्याला फटका बसलाय. दुर्दैवाने फक्त ६८% मिळाले जे खूपच कमी होते.
निकालानंतर ज्याचे काका, मामा, दादा बाहेर होते त्यांनी पोरांना बाहेर नेले शिकायला, काही कडेगाव, काही कराड, काही विट्याला रवाना झाले. पोरींचं  हक्काचं भरती विदयापीठ कडेगाव होतंच.. ! मी दूरवर चांदोली अभयारण्यायतील एका निवासी कॉलेज मध्ये भविष्य शोधायला जाणार होतो.
    त्या चार तासात असा सर्व पट डोळ्यासमोरून सरकून गेला. बालपण सोडून मी आता एका जबाबदार जगात प्रवेश करता झालो. आणि आयुष्यातील एक सुवर्णकाळ मनाच्या कुपीत बंद झाला तो फक्त आयुष्याच्या एखाद्या वळणावर आठवणी उगाळून चेहऱ्यावर हास्य उमटवायला.. !

आपले बालपण परत मिळू शकत नाही पण आपल्यातल्या त्या निरागस लहान मुलाला जपण्यासाठी आणि पाय कायम जमिनीवर ठेवण्यासाठी संत तुकारामांचा हा एक सुंदर अभंग ...

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।
- संत तुकाराम

 _____________________________________________________________________

Monday, 6 February 2017

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

         आजमितीस जी काही फिरण्याची माझी आवड जोपासलीय त्याची पाळे मुळे अगदी थेट शालेय जीवनात जातात, प्रवासाचं भाग्य तस खूप लहानपणापासूनच लाभलेलं मला. कारण हि तसच, आपले लाड जिथे सर्वाधीक पुरवले जातात असे नातेवाईक  मामा व आत्यांची गावे ७० किमी च्या परिघाच्या बाहेर. त्यामुळे लांबचा (त्यावेळी हा लांबचाच ) प्रवास पप्पांसोबत घडायचाच. पाहत गेलो. शिकत गेलो.
खेडे गावातील पार्श्वभूमी असली तरी आमच्या गावाला डोंगराचं भाग्य लाभला  नव्हतं ती कसूर भरून काढली ती जवळील च ३ किमी वरील तुकाई देवी डोंगराने. प्राथमिक शाळेत असताना तुकाई देवीच मंदिर व डोंगर आणि त्या डोंगरात असणारी गुहा हे उत्सुकतेचे विषय असत.
        हे झालं कौटुंबिक. पण माझा पहिला विनाकौटुंबिक प्रवास घडला तो इ. ५ वी मध्ये. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने. तर आपण आपण आत्ता त्या दिवसाचा धावता आढावा तब्बल १७ वर्षांनंतर घेणार आहोत.
आमची शाळा श्री मुकुंदराज विद्यालय शाळगांव 

       तर झाले असे कि, इ.४ थी पास झाल्यानंतर समोर दुसरा कोणताही पर्याय नसल्यान परंपरेला अनुसरून मला इ. ५ वी मध्ये घालण्यात आले. गावात जि.प. शाळा ४ थी पर्यंत असल्याने पंचक्रोशीतील तब्बल ३ किमी अंतरावरील एकमेव विद्यालय असे श्री. मुकुंदराज विद्यालय शाळगाव येथे आम्ही उत्साहाने जाऊ लागलो.
संक्रमणाचा काळ होता तो. साल इ. स. २०००. विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात जग प्रवेशत होत. एका बाजूला तिकडे दूरदेशी अमेरिकेत ४२ वे अध्यक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे बिल क्लिंटन यांचेकडून ४३ वे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज डब्लू बुश यांच्याकडे सूत्रे आलेली तर इकडे केंद्रात मोठा सत्ताबदल झालेला. नुकतेच १३ वे पंतप्रधान म्हणून अटलजीनी NDA तर्फे  ११वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल UPA यांच्याकडून सत्ता हातात घेतलेली, तर महाराष्ट्रात उलट झालेलं, नुकतीच जन्माला आलेल्या NCP ने स्थिर स्थावर होत INC सोबत आघाडी करत महाराष्ट्रात युती कडून सत्ता हिसकावून घेतलेली.
                  तिकडे सचिन  तेंडुलकर कडून क्रिकेट टीम चे नेतृत्व सौरव गांगुलीकडे सरकलेले तर ऑस्ट्रेलीयामध्ये मार्क टेलर कडून स्टीव्ह वॉ कडे नेतृत्व बदल होत होता, संगणक सर्वसमावेशक होण्याकडे एक एक पाऊल पुढे सरकत होता आणि दुसऱ्या बाजूला या बदलाचा भाग होत आमच्या शाळेतील मा. घाडगे सरांनी तब्बल १० वर्षांनंतर शाळेतून सहल काढण्याचा घाट घातलेला. व तो यशस्वी करूनही दाखवला. वर्गात नोटीस येताच घरच्या गृहीत  धरून नावनोंदणी केली हि, व अपेक्षेप्रमाणे घरून मंजुरीही मिळाली लहान गटास ७५ रुपये प्रत्येकी व १५० रुपये मोठा गट असे विवरण होते. तत्कालीन परिस्थितीत सहलीसाठी खर्च हा अनावश्यक गटात मोडत असल्याने, व पालकांची मानसिकताही सहलीयोग्य नसल्याने, सहलीचे प्रयोजन बारगरळे  जायचे पण आम्ही नशीबवान ठरलो न यंदा इरादा पक्का झाला. !! ठिकाणे ठरली चाफळ - वाई - पाचगणी - महाबळेश्वर - प्रतापगड. सगळंच नवीन होत चाफळ वगळता, कारण आईसोबत संक्रातीला चाफळ च्या राममंदिरला बरेचदा जाणे झालेले.
                          उत्साह शिगेला पोहचलेला बालमित्रांसोबत पहिल्यांदाच प्रवासास निघत होतो. घरातील मंडळी झाडून तयारीला लागलेली, आईने खाऊ बनविला, ताईने कपडे इस्त्री करून ठेवली, पप्पानी ५० रुपये खर्चाला दिले जी कि खूप मोठी रक्कम होती. पोरगं सहलीला चाललंय कोडकौतुक झालं!
प्रातिनिधिक चित्र 

                     दिवस ठरला १६ डिसेम्बर २०००. वार शनिवार भल्या पहाटे बोचऱ्या थंडीत, शाळेतील मैदानात पप्पानी सायकल वरून आणून सोडल. १० शिक्षक, १०० विद्यार्थी, २ बस असा आमचा लवाजमा कदम सर व घाडगे सरांच्या नेतृत्वाखाली पहाटे ५:३०वा. चाफळ च्या दिशेने सरकला.तांबडं फुटायला आम्ही चाफळ ला पोहचलो . मांड व तारळी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या चाफळ गावात थंडीचा जोर आणखीच जाणवत होता. मुख्य द्वाराने प्रवेशते झालो, मुख्य मंदिरात श्रीराम, लक्ष्मण व सीता व समोर नम्र भावे दास मारुती आहे  जे समर्थ रामदासांनी शके १५६९ (सन १६४८ )स्थापन केलेले आहे. त्यानंतर इतिहासात चाफळ हे समर्थ संप्रदायचे मुख्य मठ म्हणून नावारूपास आले.  असं म्हणतात १९६७ च्या भूकंपातही या  मंदिरांना  धक्का लागला नाही कि तडा गेला नाही.
                      दर्शन घेऊन प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झालो अन मला माझी कानटोपी हरवल्याचा साक्षात्कार झाला मग ती शोधण्याच्या नादात ४/५ प्रदिक्षिणेसह संपूर्ण कॅम्पस फिरून  झाला आणि शेवटी किश्यात खोचलेली आढळली अशी झाली गम्मत....आनंद च एवढा होता कि भान हरपून मजा घेत होतो ना !
                    झालं !! न्याहारी होतेय तोच कदम सरांची शिट्टी कानी पडली आणि गाडी सुटली ती थेट पाचगणी
च्या टेबल लँड पठारावरच  थांबली
     पाचगणी.
.कोवळी ऊन्ह अंगावर  घेत सर्वजण गाडीतून उतरली.  त्या विस्तीर्ण पठारावर काय पाहायला न का आलोय हे  त्यावेळी तरी  उमगलं नव्हत. १०० जणांमध्ये एका कडे कोणाकडे तरी कॅमेरा होता असा पुसटसं आठवतंय. त्यामुळे फोटोसाठी जो आत्ता वेळ वाया जातो तो आम्ही मस्त मित्रांनी गृप करून टंगळमंगळ करण्यात जायचा, खोड्या काढणे, टपली मारणे याची जागा पुढे जाऊन सेल्फी घेणार होती, म्हणून ती मज्जा आम्ही त्यावेळीच करून घेतली .. टेबल लॅन्ड वर थंड हवेत एक फेरफटका मारला  तोच शिट्टी वाजली. एव्हाना १० वाजत आले होते. आता वाईचा भला मोठा गणपती खुणावत होता. पाचगणीवरून फार दूर नव्हता वाई लगेचच वाई मध्ये दाखल झालो, घाईतच गणेश दर्शन झालं,बाजूच्या काशी विश्वेश्वराचेह.  दर्शन घेऊन  संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे लांबूनच आशीर्वाद घेतले.  घाटावरील तो मंदिरसमूह पाहून वेगातच प्रतापगडच्या दिशेने गाडी निघाली. १२ वाजत होते. महाबळेश्वर च्या घाटात मध्येच एक झरा पाहून गाडी थांबली गेली, सर्वजण उतरले इथे जेवणाचा कार्यक्रम पार पडायचा होता. खळखळत्या पाण्याच्या मंजुळ आवाजासोबत निसर्गात तो जो जेवणाचा आनंद होता तो निव्वाळ अविस्मरणीय!!
                 शिट्टी वाजली. गाडी सुटली ! १० वी मधील काही पोरांनी एक टेपरेकॉर्डर आणला होता मागच्या सीट वरील गोंधळात मीपण सामील झालो, धडकन, ढाई अक्षर प्यार के, बिच्चू या सिनेमांतील त्यावेळी बस मध्ये ऐकलेली गाणी आजही कानात गुंजतात.त्यापैकी 'dulhe का सेहरा... ' अक्सर इस दुनियामे अनजाने मिलते हे' हि गाणी खूपच भाव खाऊन गेलेली. मीही कधी गोंधळात सामील झालो कळलंच नाही ....
आला प्रतापगड आला !
                   आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी गडावर भटकणार होतो, योगच नव्हता त्याआधी, तसं पप्पानी एकदा बस मधून सदाशिवगड दाखवलेला इतकीच काय ती गडाशी ओळख. गाडी थांबली, उतरताच समोर अजस्र तटबंदीने वेढलेल्या किल्ल्याचे दर्शन झाले. अफजल खान इथेच फाडला होता कसा फाडला असेल ? कुठे ते युद्ध झाले असेल ? अशी प्रश्ने मनात घर करून होती उत्तरे आज मिळणार होती.
कदम सरानी काही शिस्तीच्या सूचना केल्या आणि आम्ही त्यांच्या मागे चालते झालो. वीसेक मिनिटात मुख्य द्वारापाशी आलो द्वाराची गोमुखी पद्धतीची रचना इतिहासाच्या सरानी समजावून सांगितली आणि पुढे आम्ही ध्वज स्तंभाच्या बुरुजावर गेलो. तिथून समोर कोयनेचे खोरे आणि अभयारण्याच्या घनदाट जंगलाचा परिसर पाहून उरात धडकी भरली आणि असली जंगले भविष्यात तुडवून काढायची उर्मी पेटू लागली ती आजतागातायत जिवंत आहे.
                          आता बालेकिल्ल्याकडे जाऊन शिवछत्रपतींची अश्वारूढ मूर्ती पाहून सारेच अवाक झाले पुस्तकात शिकलेला इतिहास डोळ्यासमोर तरळू लागल, ती मूर्ती पाहून चौथीत शिकलेल्या शिवरायांपेक्षा शिवराय कितीतरी पटीने भव्यदिव्य आहेत असे वाटू लागले , पलीकडेच कोकणकड्यावरून खाली खाली खोलवर दिसणारे कोकण पाहून प्रतापगडाची उंची मनात घर करून गेली. नंतर भवानीदेवी मंदिर पहिले, शिवरानी स्वतः याची स्थापना केलेली हे जेव्हा घाडगे सरांकडून  तिथे ऐकलं तेव्हा हे मंदिर नव्हे तर साक्षात इतिहासच पुढे उभा आहे असा भास त्या सरांच्या बोलण्यातून हाऊ लागला होता. पुढे नगार खाण्यात गेलो एका गाईड काढून आम्ही प्रतापगडच्या संग्राम ऐकला आणि इतिहासाबद्दलची  गोडी वाढत गेली.
वेळ झाला होता अजून अफलखानाची कबर पाहायची होती, शिट्टी वाजली सर्वजण एकत्र झालो सरांच्या मागे मागे खाली उतरलो, कंबर पहिली तो शामियाना इथेच कुठेतरी उभारला असेल.
                    गडदर्शन झालं. जेमतेम २ तासाच्या त्या गड भेटीत खूप काही मिळवलं होत. एक प्रेरणा मिळाली होती, एक आवड मिळाली होती मला.
                         आता गाडी पुन्हा महाबळेश्वर च्या दिशेने निघाली होती, ४:३० च्या दरम्यान महाबळेश्वर ला पोहचलो. गांधीजींची तीन माकडे म्हणून त्या गाईड ने दाखवलेली आठवतंय, आरडा ओरडा करूंन आवाज परत ऐकायचा एक पॉईंट पहिला, Echo point म्हणतात त्याला ते आटा समजल. घास दुखेस्तोवर ओरडलो परत आवाज आला कि मज्जा यायची, काही १० वी च्या पोरांनी मुलींना दिलेली टोपण नावे घेऊन वातावरण तापवून सोडलं होता :D सकाळ पासून त्यांच्यात असल्याने असली राजकारणे कळायला लागली होती ;) त्यांची मजा वेगळी आम्ही फक्त हसण्याचा भूमिका पार पडायचो :D
                            पुढे कुठून तरी त्या गाईड भाऊ ने  राजा हिंदुस्थानी अमीर खान चा बंगला दाखवला असं काहीतरी आठवतंय .
नन्तर सनसेट पॉईंट ला गेलो २० मिनिटे बसलो सूर्य वरच्या वरच नाहीसा झाला असा सूर्यस्त पहिल्यांदाच पहिला होता नाहीतरी तोपर्यंत सूर्य डोंगराआड च जायचा. जास्त कौतुक नाही वाटलं काही, लायनीत मागे येऊन बस मध्ये बसलो अंधार झाला आता देव देव बाकी. श्री क्षेत्र महाबळेश्वर गाठलं, या कहाण्या ऐकल्या सप्त नद्यांचा संगम पहिला ते मात्र अजूनही लक्ख आठवतंय. कारण तो कोणती नदी ५ वार्ष्णीं येते तर कोणती १२ वर्षांनी येते असा काहीतरी फास्ट फास्ट सांगत हता आणि मी पुन्हा पुन्हा तेच विचारून त्याला भंडावून सोडत होतो तरीही अजूनही मला ते गणित कळलं नाही :D
झालं. हेही पाहून झालं
                      .आता बस महाबळेश्वर स्टॅन्ड मध्ये आली आणि सर्व जण जेवायला हॉटेल मध्ये गेले, मला भूक नव्हती मी बस  ठरवलं. झोप काही लागेना म्हणूनखाली उतरलो. बाजूला स्टॅन्ड मध्ये tv वर हाथी मेरे साठी सिनेमा चालू होता, बसलो बघत. अर्ध्या तासाने झोप यायला लागल्यावर उठलो व बस मध्ये जाऊन झोपलो जागेवर, काहीवेळात लक्षात आले बस मध्ये जी थोडीफार लोक आहेत ते अनोळखी आहेत आणि आपल्या बॅगा पण नाहीत इथे, कळालं चुकीच्या बस मध्ये बसलोय, ती महाड ला जाणारी बस होती. उतरलो.  बस शोधायला लागलो, सारख्याच बस दिसत होत्या सर्व , घाबरल्या मुळे आणखीच गोंधळलो होतो, रडूच यायचं बाकी होत इतक्यात दुरून शिट्टीचा आवाज आला धावत तिकडे गेलो एक कोणीतरी कमी आहे म्हणून मोजामोजी चालू होती मी धावत आलेलो दिसतात कदम सरानी एकाएकी माझ्यावर हल्ला चढवला पण आपले लव्हली घाडगे सर मदतीस धावून आले व वेळीच हस्तक्षेप करून माझा पार्श्वभाग लाल होण्यापासून वाचवला :D
                                    १० वाजण्याच्या दरम्यान बस निघाली सर्वजण गपगार झोपले होतो. त्या घटनेमुळे झोप गेलीच होती. पुन्हा एकदा सर्व दिवस आठवला (त्या रिवाइंड मुळेच आज १७ वर्षांनी पण सहज सर्व आठवतंय ) का दिवसात खूप काही पाहून शिकून निघालो होतो. नन्तर च्या सर्व सहलीला पहिले नाव द्यायचेच या इराद्यानेच. पहाटे ३ च्या दरम्यान शाळगाव च्या वेशीवर बस आली, १२ ला येणार म्हणून सर्व पालक मंडळी ३ तास वाट पाहत बसली होती, आपापली पोरं उचलली व चालू पडले.
        खूप आनांदात न उत्साहात झाला होता कार्यक्र्म त्यांनतर च्या वर्षी पुणे दर्शन ची सहलीत केलेल्या प्रतापाने मला वर्गाचा सहल मंत्री पद आपोआप मिळत जायलं लागलं ;)
प्रतापगड । प्रातिनिधिक चित्र 

हा आता जरा कामाचं ..


  • भटकंती सुरु करण्याच्या आधी वरील  चिन्हे व संदेश आपल्या चित्तात, मनात, अंतःकरणात रुजावा.
  • निसर्ग नियमांचे भान असुद्या, प्राणिमात्रांच्या आदर राखा. 
  • सुशिक्षित वागा (नसले तरीही  दिखावा करा )

समाप्त :


Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...