आठवणीतील माणिकगड

आठवणीतील माणिकगड 

पट कथेचे नाव- आठवणीतील माणिकगड  
लेखन- योगेश आलेकरी
विषय- गिर्यारोहण
ठिकाण - सह्याद्री पर्वतराजी
कलाकार- योगेश , समीर , महेश
 हा… तर झाले असे कि, आम्ही माणिकगडावर गिर्यारोहण करायला निघालो व चित्रविचित्र अनुभव घेऊन परत आलोही हि, त्याबद्दल घेतलेला हा धावता आढावा-

इकडे महाराष्ट्रात सालाबादप्रमाणे यंदाही पावसाळा आला होता. नेहमीप्रमाणे तो मे च्या काहीसा नंतर व ऑक्टोबर च्या काहीसा आधी आला पैकी ऑगस्ट महिन्यातील एका दिवशी आम्ही वर उल्लेखलेल्या गडावर जायचं ठरवल अगदी अचानक !! मी, महेश, समीर व सोबतील चिले सर यांचे एक पुस्तक. पैकी आमची तत्कालीन परिस्थिती अशी कि, मी काहीसा तुरळक आजारी, समीर सक्काळीच रक्तदान करून आलेला(त्यामुळे झालेला उशीर), व महेशराव रात्रभर जागरण झाल्याने डोळे लाल करून आलेला.
   नियोजन (????)अचानक झाल्याने गडाबद्दल व वाटेबद्दल पुरेपूर माहिती घेता आली नव्हती. मी कोणत्याच मनस्थितीत नसल्याने नियोजन व पथदर्शन या दोघांवर सोपवलेले.
 पनवेल वरून ११:४५ ची बस पकडून १२:४७ ला वाशिवली गावात दाखल. पुढे खानाखजाना उरकून वडगावात २:०० IST  वा. दाखल . घाईनेच गावातून वाट विचारून घेऊन चालू पडलो. चुकीचा पहिला फटका बसला, चांगली दिसली म्हणून निवडलेल्या वाटेने पूर्ण गावाची भातशेती फिरून दाखवली. पुन्हा गावात येउन योग्य (??)वाट धरून निघालो पावसाने जोर वाढवल्याने परिसर अंधुक झालेला. एका पठारावर पोहोचलो व होती  नव्हती तीही  वाट वाढलेल्या गवताने गिळंकृत केलेली. शोधाशोध चालूच होती पावसाने पूर्ण धुमाकूळच घातला होता. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सैरभैर वाटचाल चाललेली (भलतीकडेच). तशातच तिथे एक गाववाला भेटला फुल तर्राट, गावठी इफेक्ट. जेमतेम १५ मिनिटे पुरेल  एवढी वाट त्याने पुरवली. पुन्हा एक पठार लागले माजलेल रान, गवत, डबकी याचाच अंमल. पावसाचा मारा चालूच.!!
एक चर्चासत्र रंगलं. तर्क वितर्क झाले न एक थोडीशी मळलेली वाटलेली वाट मिळवली व चालू पडलो, खाली मन घालून. !! एवढ  माहित होते कि गडाला उजवीकडून  वळसा घालून  वाट पाठीमागून गडावर जाते, दुरवर गड दिसत होता पण उजवीकडे वळण्याची संधी मिळत नव्हती. उजव्या बाजूला एक टेकडीवजा डोंगर सोंड होती तिच्या पलीडून गडची वाट असल्याची दाट शक्यता होती म्हटल हीच वाट जाईल त्यावरून पलीकडे. पण वाट वर न चढताच नुसतीच पुढे पुढे  घेऊन जात होती, निबिड अरण्य, मुसळधार धो-धो कोसळणारा पाऊस, झाडांचा आवाज व आमची चर्चा (सकारात्मक) वातावरण भेदत होती. पावसाने एवढे बधिर केलेले कि, वर बघणे पण मुश्कील. !
अन एका क्षणाला आम्ही अचानक थबकलो …समोरच्या झाडाझुडपांतून जोरदार हालचाली झाल्या, आम्ही स्तब्ध.…. थोडसं धाडस करून पुढे सरकलो आणि समोरचं  दृश्य बघून पटापट झाडे पकडून उभे राहिलो. आणीबाणी झालीच सरसर झाडावर चढता याव या उद्देश.
हां तर समोर ५०-६० गाई- बैलांचा कळप आमच्या आगमनाने सावध झालेला. सार्वजन आमच्याकडेच  तोंड करून कान टवकारून उभे, पहिल्या फळीत ४-५ उमदे बैल आक्रमक पवित्र्यात उभे, अगदी २० फुटांवर. मोकाट जनावरांचा भरवसा काय ?? पण इतक्यात एका अतिसंवेदनशील सदस्याने परिस्तिस्थिचे (आमच्या) गांभीर्य ओळखून पलायनवाद स्वीकारला व बाकीच्यांनी एक मताने त्याला अनुमोदन दिल्याने आजूबाजूची झुडुपे विस्कटत, चिखलगाळ उडवीत, पावसाच्या सुरात भसाडा आवाज  मिसळत तो कळप दिसेनासा झाला व आम्ही पुढे एका स्थानिक मद्यनिर्मिती केंद्राजवळ येउन दाखल झालो. पाण्यचा झरा पार करून पुढे  काही अंतरावर आणखी एक मोहमिश्रित मद्यनिर्मिती केंद्र लागले. रस राशीत निखारे पाहून अंदाज बांधला कि केंद्रावरचे कर्मचारी आमची केमो कलर कपडे पाहून पसार झालेले असावेत.
मध्येच जंगलातून गड दिसल्याने आलेली एक reaction 

पावसाची उघडीप मिळाली, वेग वाढवला. आणि जंगलातून बाहेर पडताच समोर माणिकगडाचा  सरळसोट  कातळकडा पुढ्यात. वाट संपली, वाट लागली. उजवीकडून मारायचा वळसा उजवीकडेच राहिला. आम्ही चक्क ३ तास चुकीच्या वाटेवर चालत होतो. उजवीकडील डोंगरसोंड आमच्याकडे कुत्सितपणे पाहु लागली होती. आता त्या डोंगरावर गेल्याशिवाय पर्याय नव्हता. कोणत्या तरी उंच ठिकाणी गेल्याशिवाय बरीच कोडी उलगडणार नव्हती. एक नाळेतून वरती चढण्यचा अयशस्वी प्रयत्न  झाला, तिथे एका निसरड्या दगडाने सम्याला दलेला प्रसाद सम्या त्यावर अधून मधून झेंडू बाम चोळून आठवत असतो.
अगदी गडाच्या पायथ्याला पोहचलो पण चुकीच्या जागी 


बाजूने वाढलेल्या गावातून उतार पाहून वर चढून गेलो आणि उलगडलेली कोडी अशी -
  • रस्ता पूर्ण पणे  चुकलेला. 
  • ज्या वाटेने आलो ती वाट 'मद्यपींनी मद्यपींसाठी चालवलेली' वाट होती . 
  • या डोंगराच्या उजव्या बाजूने खालून जी वाट दिसतेय ती गडावर जाणारी आहे, व अजून २:३० तासाची चढाई बाकी आहे व वेळ ४:४३ मिनिट. 
पडलेले प्रश्न -
  • भावनेच्या भरात आत्ता गडावर गेलो तर येणार कसा ? विजेरी एकही नाही. 
  • मग काय रिकाम्या हाती घरी परत ??
  • रहाच कुठ ? खायचं काय ? मुक्कामाचा कोणतच  साहित्य सोबत  नव्हत. 
सोबत आणलेल्या इडल्या खात खात उत्तरे मिळवली व मुक्काच्या  शोधात निघालो. नकाश्यावर एक कातकरवाडी दाखवत होती. तिकडे जाता जाता वाटेत पहिला धक्का बसला - सकाळी जिथून चुकीची वाट धरली तिथून थोड जरा पुढे आलो असतो तर आत्ता गड उतरून परतीच्या प्रवासाला असतो.
तिथ आलो अन् समजला वाडीच पुनर्वसन झालाय, भग्न उध्वस्त झालेला तो पाडा आमचे प्रश्नांकित चेहरे पाहून चिंतीत झाला असेल. दूरवर एक निळे छप्पर दिसले, ३७ मिनिटांच्या दुडक्या चालीने ठाकूरवाडी नावाच्या गावात आलो. हे वाशिवली पासून १५ मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणजे आम्ही पुन्हा अगदी पायथ्याला आलेलो.
गावात आल्यावर चा एक क्लिक 

     गावात आलो आणि धक्क्यांवर धक्के मिळत गेले. एका सज्जन व्यक्तीकडे निवाऱ्याची मागणी केली त्यासाठी शाळा   मंदिराची चौकशी करता गुरुजींशी फोन वर बोलणी करून शाळेची चावी मिळवली अन् एक प्रश्न सुटला… !!या परिस्तिथित जिथे पाठ टेकवायला जागा मिळावी हि अपेक्षा असताना चक्क मार्बल ची रूम  मिळाली सोबत मोबईल व कॅमेरा चार्गिंग ची सोय म्हणजे अहो भाग्यं !!
ब्लोग लेखकाची लेखन मग्न अशी एक दुर्मिळ छबी ;) ;)

माह्या पुस्तक वाचनात गुंग 
 या धक्क्यांतून कसेबसे सावरून बाहेर आलो तोच एक प्रचंड धक्का बसला- उरलेले २ बिस्कीट पुडे व अर्धा पुडा ब्रेडवर भागेल या चर्चासत्रात गुंतलो असतानाच त्या सज्जन कुटुंबाची गृहिणी जेवणाची विचारपूस  करायला आली  'जेवणाचे किती ?' हा टिपिकल ट्रेकरी प्रश्न विचारून स्वताचेच हसे करून घेतले ना !!.त्यावर त्यांचे उत्तर - " तुम्ही पाहुणे आहात आणि पाहुण्याचे जेवणाचे पैसे घेण्याची पद्धत नाही आमच्याकडे." अक्षरश: पाणीच यायचं बाकी होत डोळ्यातून . झालं ... जेवण तयार असल्याची वर्दी आली, हात पाय धुवायला चक्क गरम पाणी पाहून तर रडूच कोसळलं !!काय ती खातिरदारी कधी घरातून गरम पाणी मिळालं  नव्हतं ;) हेही कसं बसं सहन केलं. आत गेलो, तिघांना तीन पानं  सतरंजी टाकून लावलेली . वरणभाताचा मस्त सुगंध येत होता पापड, लोणचं,वांग्याची भाजी जनु आमची वाटच  पाहत होते. T. V. वर फिर हेर फेरी मध्ये अक्षय व परेश रावल यांची   
ची मस्त विनोदी जुगलबंदी पाहत जेवणे आटोपली.
जाताना केरोसीन चा दिवा, हेडल्यम्प , नको नको म्हणताना ३ ब्ल्यांकेटस् हातात पडली. जरा शेकोटी पेटवावी म्हणून २ लाकडांची ओघवती मागणी काकांकडे केली न ढीग भर लाकडे शाळेसमोर पडली ऐन पावसाळ्यात सुख्या लाकडाचा दुष्काळ असतानाही. व गप्पाना साथ ही दिली.
दूरवर चमकणारा एक्स्प्रेस हायवे (मुंबई पुणे द्रुतगती मार्ग )  पाहत निरव शांततेत मन भरून  घेऊन कधी झोपी गेलो कळलेच नाही.
शेकोटीला सोबत देणारे गावातील मित्र 

लहान खेळत मग्न बालगोपाळ 

शेकोटी 
              आता उठून सकाळच्या धक्क्यांसाठी  सज्ज झालो, चहा घेऊन काका आलेच फक्कड चहा न् बिस्कीटाचा अपेक्षित धक्का पचवून नव्या दमाने, नव्या जोशाने माणिकगडाकडे कूच केली. ज्याने काळ खूपच अंत पहिला होता  आताही तेच चालू होते कितीतरी चालल्यानंतर ती माणिकगडाची लिंगी दिसली,
मग हनुमान शिल्प, पाठीमागून गर्द झाडीतून गडावर जाणारी वाट, ढगांची रेलचेल, ऑगस्ट असल्याने सर्वत्र हिरवळ दाटलेली, डोंगर उतारावरून खळखळनारे झरे सर्वच  कसे अल्हःदायक होत. मन प्रसन्न होत होत. मध्येच पावसाची सर चिंब करून जात होती
. बोलता बोलता गड माथा आला एक पाण्याच टाके डाव्या बाजूला ठेवून पुढे  चुन्याचा घाना पहिला चाक बहुदा कोणीतरी मास्तीखोराने लोटून दिल्याने सापडलेच नाही,
गडावरील चुन्याचा घाना 
पुढे एक बिन देवाची देवडी दिसली, सोबतच बाजूच्या तटात बुजलेला  दरवाजा दिसतो . तर त्यासमोर बाजूलाच एका दरवाज्याची कमान आपल्या गणेशपट्टीकेसाहित उभी दिसते. आता पण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो.
गणेशपट्टी व दरवाजा 

बालेकिल्ला 


बिन देवाची देवडी किवा घुमटी 
इथे २ भली मोठी पाण्याची टाके आहेत. तर काही घरांच्या जोत्यांचे अवशेष. त्यापुढे पश्चिमेकडे बुरुज व शिवमंदिर व एक भंगलेले गणेश शिल्प इथेही काही पाण्याची टाकी. व २ अर्ध्या वीरगळी पाहायला मिळतात. पुढे काही पायऱ्या चढून उत्तरेकडील बुरुजावर पोहचतो.थोद चाललं  कि आपली गड फेरी पूर्ण होते. इथून आपल्याला इरशाळगड, प्रबळगड, कलावंतीन, कर्नाळा, पाताळगंगा नदीचे खोरे व सर्व्र्त्र भरगच्च जंगल नजरेस पडते वरून पाहताना ढगांनी खाली उतरून झाडांशी घातलेला पिंगा भलताच विलोभानीय दिसतो, मन प्रसन्न !!! ज्यासाठी हा अट्टाहास चाललेला तो माणिकगड पाहून झाला भर पावसात एक एक्कालकोंड्या गडावर असणं म्हणजे खरंच  एक अल्लाहादायक अनुभवच. असो.
आज मैं उपर आस्मा निचे . 

सह्याद्रीचे सौंदर्य 

निवांत महेश 
परतीचा प्रवस हाती घेतला. एकदिवसीय माणिकगडाने दोन दिवस झुंझवले होते एक  निमुळती वाट धरून उतरत असता दूरवर पाताळंगंगेवर ढगांचे जमलेले पुंजके त्या हरित सौंदर्यात घातलेली भर न्ह्याहाळत गड अर्ध्यावर उतरून झाला आणि पाऊस ऐन भरात  आला त्याच्या टपोऱ्या थेंबात आमचा इवलसं जीव मुठीत घेऊन आम्ही जंगल उतरत होतो. आता सपाटी वरून वाटचाल चालू झाली, ओढे- नाले धो धो वाहत होते, काही बारकी पोरे चिम्बोर्या पकडण्यात गुंग होती. पावसाने जराशी उसंत दिल्याने फोटो काढता आले

. २:२९ च्या सुमारास  गावात दाखल झालो ते शेवटचा धक्का पचवायला. त्यांच्या अंदाजानुसार ५ ला  येणारे आम्ही लवकर आल्याने त्यांना गिल्टी फील झाल कारण त्यांना आम्हला जेउ घालावयास वाटू लागलेले. सकाळीच न्याहारीचा आग्रह नाकारला होता व आत्ता आणखी काही सेवा नको असाही बजावले होते. पण त्या सज्जन गृहस्थांनी एक धक्काच दिलाच. पाऊस  वाढल्याची संधी साधून म्हातारीशी (वय १०३) बोलण्यात गुंतवून ठेवत बिस्कीट आणले व त्यांच्या मिशेष ने पण  कटात सहभाग नोंदवत गुपचूप कधी चहा आणला कळलेसुद्धा नाही.
समीर व आज्जी यांच्यात स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर काळात बदलेले ग्रामीण जीवन यावरील संवाद 

पारधी काकांच्या आई वय १०३ वर्ष (२०१५ रोजी )

पारधी कुटुंबीय 

चहा- बिस्कीट घेत " अतिथी देवो भवं "ची प्रचीती घेतलि. पाहून चारापुढे निशब्ध होतो. पराधी  कुटुंबीयांचे आमच्यावर न विसरण्याजोगे उपकार आहेत. ज्येष्टाच्या पाया पढून निघालो ते पुन्हा यायचच या आग्रहानेच.
अशा प्रकारे माणिक गड व त्या पारधी कुटुंबीयांनी मनात एक वेगळे घर केलेय.!
                      सह्याद्री हा जेवढा मायावी आहे
                        त्याहून कैक पतीने मायाळूही आहे ….


-सविस्तर वाचनाबद्दल धन्यवाद  _/\_

Comments

  1. आवडला दादा ....असा वाटला की मी ही तुमच्या सोबत आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

शाळा- मंतरलेले दिवस

झपाटलेला ट्रेक